बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक फटका बसला, तर काही जणांना कंपन्यांनी कामावरून काढून टाकले. त्यात सर्वांत मोठा फटका पथविक्रेत्यांना बसला. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने स्वनिधी योजना(Swanidhi Yojana) सुरू केली आहे.
२ जुलैला ही योजना सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत या योजनेसाठी २५ लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले. त्यातील १२ लाखांहून अधिक लोकांचे अर्ज मंजूर झाले. उत्तर प्रदेशातून ६.५ लाखांहून जास्त लोकांनी या योजनेंतर्गत अर्ज केले. त्यापैकी ३.२७ लाख अर्जांना मंजुरी देण्यात आली, तर उत्तर प्रदेशात स्वनिधी योजनेच्या कर्जासाठी स्टॅम्प शुल्क माफ करण्यात आले आहे.
टाळेबंदीचा फटका बसलेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मोदी सरकार स्वनिधी योजनेंतर्गत १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. पीएम स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून रस्त्यांवरील दुकान लावणाऱ्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम स्वनिधी योजनेचा मूळ हेतू फक्त कर्ज देणे एवढाच नाही, तर याकडे पथविक्रेत्यांच्या संपूर्ण विकास आणि त्यांचे आर्थिक उत्थान, या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या बँकेत जाऊन, या योजनेंतर्गत कर्ज घेऊन पुन्हा आपला उद्योग सुरू करू शकता. कोरोना महामारीदरम्यान मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या योजनेची सुरुवात केली असून, या योजनेद्वारे ५० लाख लोकांना कर्ज देण्याचे लक्ष ठेवले आहे. तसेच हे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी किंवा गॅरंटी देण्याची गरज भासत नाही.