मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथीनुसार बुधवारी (दि. 31 मार्च) येणारी शिवजयंती साधेपणाने आणि 100 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करावी, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. तिथीनुसार शिवजयंतीसाठी शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी सर्व सण, उत्सव तसेच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. तिथीनुसार शिवजयंती राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी केली जाते. मात्र कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी येणारी शिवजयंती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ 100 जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला व इतर गडावर हजेरी लावतात. मात्र यंदा किल्ल्यांवरही एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे. पोवाडे, मर्दानी खेळ, व्याख्यान, गाणे, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. त्यावऐवजी ऑनलाइन प्रक्षेपण करण्याचे आवाहन केले आहे. प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुकांवरदेखील बंदी घातली आहे. राज्यात भासणारा रक्ताचा तुटवडा तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रक्तदान शिबिर व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.