पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना घोषित केलेला पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा, अशी मागणी भीम आर्मीने केली. बाबासाहेब पुरंदरेंना दिलेल्या पुरस्काराच्या विरोधात भीम आर्मीने पुण्यातील बेलबाग चौकात निदर्शनं केली. यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप भीम आर्मीने करत ही मागणी केली.
शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि जीवनावर वादग्रस्त लिखाण केलं आहे. तसंच त्यांनी शिवाजी महाराजांचे गुरु समजले जाणारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे, असे आरोप बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आहेत. त्यामुळे भीम आर्मीने पुरंदरेंना दिलेल्या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, भीम आर्मीने विरोध करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने संताप व्यक्त केला होता. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला होता. पुरंदरेंना पुरस्कार दिल्यास महाराष्ट्रात वैचारिक आग लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसंच आव्हाडांनी पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतानाही विरोध केला होता.