बहुजननामा ऑनलाइन टीम : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला मंत्रीमंडळ विस्तारासाठी अजूनही मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापनेचा नवीन प्रयोग साकारण्यात आला. या आघाडीत मंत्रीपदावरुन अद्याप एकमत झालेले नाही. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार केवळ फुटीच्या भितीने रखडला आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीपुर्वी आपल्याला विरोधात बसावे लागणार याचा विचार केला होता. त्या दृष्टीने या नेत्यांनी तयारी देखील केली होती. मात्र, अचानक राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली. आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. यामध्ये कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह 15 मंत्रीपदे असून राष्ट्रवादीला 16 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेनेत मंत्रीपदासाठी जाहीर नाराजी व्यक्त करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे पक्षप्रमुख सांगतील तोच आदेश समजून नेते काम करतात. मात्र कॉंग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये हे पहायला मिळाले होते. राज्यातही असे होण्याची शक्यता आहे. किंबहूना मंत्रीपद न मिळाल्यास, फुटीची निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्रीपदावरून आमदार फुटण्याची शक्यता असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळविस्तार मागे ठेवल्याची चर्चा राज्य वर्तुळात आहे. तर शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत गृह खात्यावरुन एकमत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Visit : bahujannama.com