मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या नव्या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. मुख्यमंत्र्यासोबत ६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून आठवडा उलटला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, मंत्री सुभाष देसाई यांच्या बंगल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार असल्याची माहिती आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही उपमुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीतील मंत्रिपद देण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. मात्र शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. गृह, अर्थ यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आले असून राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांमध्ये यासाठी रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होणं महत्वाचं आहे. तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहू शकतात. पण खातेवाटप न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकार निशाण्यावर येऊ शकत, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली परंतु भाजपा सरकारने आणलेले प्रकल्प मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे ते इतके बिझी आहेत की त्यांना मंत्रिमंडळ खाते वाटपासाठी त्यांना वेळच नसल्याने कामकाज थंडावले आहे, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि, शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिपदे आणि महामंडळांच्या माध्यमातून तीनही पक्षांच्या आमदारांचे समाधान करण्याचा योग्य तो प्रयत्न केला आहे. त्यासाठी आमच्या सतत बैठका झाल्या असून राजकीय परिस्थिती लक्षात घेता काही बदल अपेक्षित असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. खातेवाटपाचा निर्णय दोन दिवसात होईल, अधिवेशन असल्याने तेवढ्यापुरते खातेवाटप केले जाईल.
Visit : bahujannama.com