नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममधून 21 लोकांना अटक केली आहे. या आरोपींकडून रेल्वे 88 करोड रूपये वसूल करणार आहे. रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल 27 गुन्हे दाखल केले आहेत. तर रेल्वे सुरक्षा बलाने जाळपोळ, हिंसा, रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान आदीप्रकरणी 54 गुन्हे नोंदवले आहेत.
आरपीएफनुसार, व्हिडिओ फुटेजद्वारे अन्य आरोपींची ओळख पटवली जात आहे. लवकरच या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते. भारतीय रेल्वे दंडविधान कलम 151 अंतर्गत रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल दंड वसूल केला जाईल. याअंतर्गत कमाल सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी रेल्वे न्यायालयाची मदत घेऊ शकते.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक नुकसान
नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संकरेल रेलवे स्टेशनचे तिकिट काऊंटर जाळण्यात आले. सुजनीपारा रेल्वे स्थानक फोडण्यात आले. कृष्णपुर रेल्वे स्टेशनमध्ये अनेक रेल्वे गाड्यांमध्ये आग लावण्यात आली होती. मालदामध्ये हरिशचंद्रपुर स्टेशनसुद्धा फोडण्यात आले होते. आसाममध्ये अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने रेल्वेचे नुकसान झाले.
Visit : bahujannama.com