बहुजननामा ऑनलाइन टीम – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर युती (political map of Maharashtra)करुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. या सत्तासंघर्षाच्या काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेत ७२ तासांचे सरकार स्थापन केले खरे, मात्र, भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार वैयक्तिक होता की शरद पवारांच्या कुटील राजकारणाचा एक भाग होता, हे अजूनही गुपितच आहे.
त्यातच आता तेव्हा महत्वाची भूमिका बजावणारे देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीकडूनच भाजपाला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कोण, महामंडळ वाटप कसे होणार हे सर्व ठरलेलं. राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस हे सगळं शरद पवारांना माहिती होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावरुनच भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही, हेराफेरी करणाऱ्यांना सुरूवातीला यश मिळतं. पण त्यांचा अंत वाईट असतो, स्वत:ला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही, असे ट्विट त्यांनी केलं आहे.