बुलंदशहर : बहुजननामा ऑनलाइन – नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुपशहर पोलिस ठाण्यातील एका महिला सब इन्स्पेक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आरजू पंवार असं तीच नाव असून तिने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून त्यात इतर कोणी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुपशहर पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेली महिला सब इन्स्पेक्टर आरजू पंवार एका गावात भाड्याच्या घरात राहत होती. तिने गुरुवारी रात्री उशिरा ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री सातच्या सुमारास ड्युटीवरून परतली होती. रात्री ९ वाजेपर्यंत जेवण्यासाठी खोलीतून बाहेर पडली नव्हती. जेवणासाठीही बाहेर न आल्याने घरमालक विचारण्यासाठी गेले असता दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता आरजू पवार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. घरमालकाने हा प्रकार पोलिसांना कळवला.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या खोलीत एक चिठ्ठीही सापडली असून त्यावर हे माझ्या कर्माचं फळ आहे असं लिहिलं आहे. आरजू मुळची शामली इथली होती.२०१५ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून ती भरती झाली होती. सध्या ती अनुपशहर पोलिस ठाण्यात तैनात होती.