बहुजननामा ऑनलाइन टीम – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भारताचा इतिहासातील पहिला वाहिला पेपरलेस अर्थसंकल्प संसदेत सादर केला. पहिला पेपरलेस अर्थसंकल्प म्हणून हा इतिहास ठरला. पण या ऐतिहासिक अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, नोकरदार, व्यापारी इत्यादी कोणत्याही घटकाला दिलासा मिळाला नाही. अशी प्रतिक्रया फेडरेशन ऑफ असोसीएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेश शहा यांनी दिली आहे.
मागील साधारण ११ महिन्यांपासून कोवीडमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, छोटे मोठे व्यवसाय जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत, संपूर्ण देश आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेला असताना आजच्या अर्थसंकल्पात विविध समाजघटकांना नव्याने उभारी घेण्यासाठी काही दिलासादायक घोषणा होण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र यातून सर्वांचीच निराशा झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास आधीच लॉकडाऊन मध्ये भरडला गेलेला व्यापारी आपला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेऊन आतुरतेने बजेटची वाट पाहात होता. परंतू दिलासादायक तर काही नाहीच पण मा. अर्थमंत्री नव्याने सुरु करण्यात आलेले कर रद्द करतील असे वाटले होते ते ही झाले नाही.
वास्तविक पहाता दि. १ जुलै २०१७ रोजी GST टॅक्स लागू झाला. त्यावेळच्या “एक देश एक टॅक्स” या घोषणेनुसार इतर सर्व कर बंद होणे अपेक्षीत होते परंतू APMC सेस व देखभाल आकार, प्रोफेशनल टॅक्स, टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (TDS), कॉर्पोरेशन टॅक्स, इत्यादी कर अद्यापही सुरु आहेत. त्यात भर म्हणून दिनांक १ ऑक्टबर २०२० पासून नव्याने ‘टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (TCS) हा कर लावण्यात आलेला आहे. त्याच बरोबर ‘रिव्हर्स चार्ज मॅकेनिझम (RCM) हा अजून एक नवीन कर लादण्यात आलेला आहे. हे कमी की काय म्हणून बँकांकडून रोज अनेक प्रकारचे नवनवीन चार्जेस लावत आहेत. जसे; कॅश हँडलिंग चार्ज, कार्ड स्वाईप मशीन चार्ज, चेक रिटर्न चार्ज, डिजिटल पेमेंट्स वर चार्ज, NEFT / RTGS साठी चार्ज आता नव्याने दिनांक २० जानेवारी २०२१ पासून देशातील सर्व बँकां ५० हजार रुपयांच्या वर रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी प्रति एक हजार रुपयांना २.५० रुपये चार्ज लावण्यास सुरवात केली आहे.
अशा प्रकारे हनुमानाच्या शेपटी प्रमाणे व्यापाऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या टॅक्सेस ची संख्या वाढतच चालली आहे. किमान हे टॅक्सेस तरी आजच्या बजेट मध्ये कमी केले जातील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. परंतू व्यापाऱ्यांच्या पदरी अपेक्षाभंगच आलेला आहे. अशाने आधीच संकटात असलेला व्यापारी आणखी मोठ्या ढकलला जाईल यात शंका नाही.