मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सपा- बसपा आघाडी झाली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. असा आरोप करून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष ४८ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी आणि बसपचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर केले आहे.
भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती. पण काँग्रेसच्या नेत्यांनी सपा- बसपा आघाडीला डावलले आहे. असा आरोप अबू आझमी यांनी केला. आता उत्तर प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येणार असून लवकरच सपा- बसपा जागा वाटप होतील. याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल. असे आझमी यांनी सांगितले.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दलित. अल्पसंख्याक आणि वंचित समाजघटकांचा विश्वासघात केल्याचा आरोप बसपाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी केला. येत्या ५ एप्रिल रोजी बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सभा होईल. असे आ. आझमी आणि बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, सपाचे महासचिव अब्दुल कादीर चौधरी, महापालिकेतील सपाचे गटनेते रईस खान यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.