मुंबई ( बहुजननामा ऑनलाइन ) – बहुजन समाज पार्टीने (बसपा) महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. बसपाकडून राज्यातील २८८ जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, तसा निर्णय बसपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक विधानससभा मतदार संघातून संभाव्य ३ उमेदवारांची नावे कार्यकारणीला पाठवण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये बसपाला मानणारा एक वर्ग आहे. प्रत्येक निवडणुकीत बसापाला तो मतदान करत असतो. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उद्यानंतर हा मतदार वंचितकडे गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून निवडणुक लढवत होते. त्यावेळी बसपाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र राज्यातील दलित मुस्लिम, अन्य उपेक्षित समाजघटकतील आपली जनाधार कायम टिकवण्यासाठी ‘एकला चलो रे’ या भूमिकेतून सर्व जागा लढण्याचा निर्णय बसपाने घेतला आहे.
लोकसभेतमध्ये बसपाने महाराष्ट्रातून ४३ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यावेळी २८८ जागांची तयारी सुरू केली आहे, असे राज्याचे प्रभारी व बसपचे राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले आहे. याबाबत लवकरच बसपाच्या प्रमुख मायावती यांची भेट होणार आहे. इतर पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय त्याच घेतील असे पक्ष प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वी महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भात बसपाला मानणार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बसपाच्या उमेदवारांचा फटका वंचितला बसतो की काँग्रेसला या विषयीच्या चर्चांना उधान आले आहे.