मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पनवेलमधील नेरे गावात नियमबाह्य पध्दतीने हळदी समारंभ आणि लग्न करणे नवरदेवाला महागात पडले आहे. मौजमजा, हौस आणि मोठेपणासाठी नवरदेवाला मोठ्या भावाला गमवावे लागले. गर्दीमुळे नवरदेवाच्या भावाचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला आहे. तर गावातील इतर 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गावावर कोरोनाची दहशत असून गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे.
नेरे गावातील वामन पाटील यांनी मुलाचा लग्न समारंभ आयोजित केला होता. नवरदेव जितेश पाटील याने लग्नाच्या आदल्या दिवशी हळद होती. त्यावेळी 400 ते 500 जणांनी हजेरी लावली होती. सर्वांसाठी खेकडे, मासे, मटनाची मेजवानी होती. राज्य सरकार एकीकडे गर्दी जमवू नका असे सांगत असताना दुसरीकडे सर्व नियम पायदळी तुडवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला गेला. दुसर्या दिवशी लग्न समारंभातही मोठी गर्दी जमविण्यात आली होती. 50 लोकांना परवानगी असतानाही जास्त लोक आले होते.
अखेर कोरोना संसर्ग झाल्यामुळे गर्दीचे बिंग फुटले. नवरदेवाचा भाऊ जितेंद्र याला कोरोनाने गाठले. कोरोनामुळं त्याचा मृत्यू झाला. तर गावातील इतर 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. हळदी समारंभ आणि लग्न समारंभाला गर्दी केल्या प्रकरणी नवरदेव, वडील आणि मुलीचे वडील असे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.