मुंबई: बहुजननामा ऑनलाईन – मुलगा सतत त्रास देत असून त्याच्यापासून धोका असल्याची भीती व्यक्त करत एका ८० वर्षीय पित्याने मुलाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मुलाला फटकारत वडिलांना त्रास तसेच वडिलांविषयीची वर्तवणूक अशीच चुकीची राहिली तर तुम्हाला घराबाहेर काढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याचबरोबर सुधारणा होत नसल्यास आम्हीच तुम्हाला पोलिसांकरवी घराबाहेर काढण्याचा आदेश देऊ’, असा सज्जड दमही न्यायालयाने दक्षिण मुंबईतील एकाला सोमवारी दिला.
शहाब अन्सारी हे मरिन ड्राइव्ह येथील एका इमारतीत आलिशान फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी ज्येष्ठ वकील नितीन ठक्कर यांच्यामार्फत याचिका करून मुलगा अन्वर (नावे बदललेली आहेत) याला घराबाहेर काढण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. दाखल केलेल्या याचिकेत असे म्हंटले आहे की, माझ्या मुलाचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे. मला सतत त्रास देत असल्याने माझा संपूर्ण व्यवसाय त्याच्या नावे केला परंतु त्रास देणे काही कमी झाले नाही. मला उरलेले आयुष्य शांततेत जगायचे आहे. परंतु ते मला मुलामुळे शक्य होत नाही. त्याची मला भीती वाटत असल्याने मला दोन दिवसापासून घराबाहेर हॉटेलमध्ये राहावे लागल्याची कैफियत शहाब यांनी ठक्कर यांच्यामार्फत मांडली आहे. मात्र अन्वर याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मी अनेक वर्षे वडिलांसमवेत राहत आहे. कठीण प्रसंगी मीच तहाची काळजी घेत आहे. मात्र जर्मनीत राहणारी माझी बहीण माझ्याविरुद्ध त्यांचे कान भरत असल्याचा दावा अन्वरने केला आहे. वडिलांचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शून्यावर असलेला व्यवसाय वाढवला. त्यानंतर मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. पण कोरोनामुळे दीड वर्षांपासून तो ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मला घराबाहेर काढल्यास मी अक्षरश: रस्त्यावर येईन’, असे म्हणणेही त्याने मांडले.
दरम्यान खंडपीठाने थेट शहाब यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाने आईवरही हात उचलला होता. तो सतत माझ्यावर हात उगारतो. मलाही तो मारहाण करेल अशी भीती वाटत राहते त्यामुळे मला त्याच्या बरोबर राहण्याची इच्छा नाही असे म्हणणे मांडले. त्यानंतर खंडपीठाने अन्वरला फटकारत ‘तुम्हाला वडिलांना नीट वागवता येत नसेल तर तुम्ही तुमची स्वतंत्र व्यवस्था करा’, असा सल्ला दिला. दरम्यान, याचिकेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी अन्वरने दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. परंतु, खंडपीठाने त्याला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत दिली आहे.