उल्हासनगर : बहुजननामा ऑनलाईन – सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या यश भुजंग या मुलाचा मृतदेह परिसरातील बंद कंपनीच्या उघड्या नाल्याचे चेंबरमध्ये रविवारी (दि. 28) आढळून आला. याप्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाल्याचे चेंबर उघडे ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
यश भुजंग (वय 8 वर्ष, रा. उल्हासनगर कॅम्प नं-2 रमाबाई आंबेडकरनगर परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत यश आईसोबत राहत होता त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. तो 21 डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत होता. काही वेळाने मुलगा यश अंगणात दिसेनासे झाल्यानंतर, आईसह नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली, पण तो मिळाला नाही. अखेर उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईक यशचा शोध घेत असताना तब्बल सात दिवसा नंतर रविवारी परिसरातील बंद कुकर कंपनीच्या उघड्या नाली चेंबरमध्ये यशाचा मृतदेह सापडला.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी घटनास्थळी घाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला. घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याने, मुलाचा मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.