बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या स्वतःच्या गावातच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. दरम्यान याबाबत राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सर्वच महाविकास आघाडी सरकारवर आहे. ज्याप्रकारे आपण संवेदनशील पद्धतीने कोरोनाची परिस्थिती सांभाळली, इतरही सर्व विषय ज्याप्रकारे महाविकास आघाडी सरकार हाताळत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण जनतेचा महाविकास आघाडी सरकारवरील विश्वास वाढल्याचे ठाकरे म्हणाले.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुका निकालांचा धुराळा उडत आहे. जसजसे निकाल समोर येत आहेत, त्यासोबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. दरम्यान यावेळी ठाकरे यांना मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावळ लढवण्याचा विचार करत असल्याचे देखील विचारण्यात आले, त्यावर येत्या काळात याबाबत बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.