बहुजननामा ऑनलाईन टीम : गुरुवारी महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने शपथ घेतली, तो शपथविधी सोहळा रद्द करावा आणि तो बेकायदेशीर समजावा अशी याचिका राज्यपालांकडे दाखल केल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. शपथ विधी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नेत्यांची नावे घेतली म्हणून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र शपविधीपूर्वी नाव घेण्याची प्रथा ही भाजपचीच असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजप देखील आपला उमेदवार उतरवत असल्याचे चंदकांत पाटील यांनी सांगितले होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी आपल्या आमदारांना डांबून ठेवत असल्याचे आरोप देखील केले होते. त्यांना उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपाने फोडाफोडीची भाषा करु नये. तुम्ही फोडाफोडीचे राजकारण कराल तर भारतीय जनता पक्ष देखील खाली होईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
भाजपने पोकळ धमक्या देऊ नये आमच्याकडे १७० आमदारांचा पाठींबा आहे आणि हा आकडा वाढू देखील शकतो असे देखील नवाब मलिक म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून विरोधात बसलेली भाजप खूपच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवरुन मोठी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील ट्विटरद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका केली.
Visit : bahujannama.com