औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्ष महापालिकेत आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेने शाखानिहाय बैठका घेतल्या आहेत. तर भाजपने निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार केला आहे. तसेच भाजपला यंदा स्वबळावर रिंगणात उतरावे लागणार असून तसे संकेत भाजपने दिले आहेत.
महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार असल्याने भाजपने मंडळनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. बैठकांमधून भाजपने स्वबळाचा नारा दिला जात आहे. मागिल अनेक वर्षापासून औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने पूर्वीसारखी परिस्थिती यंदा नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी जोमाने तयारीला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. कधीकाळी भाजपचा मित्र पक्ष असलेला शिवसेना आता काँग्रेस, राष्ट्रवादीचा मित्र पक्ष बनला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढावे लागणार आहे, तसे संकेत भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.
तसेच जो असेल त्याच्यासह आणि जो नसेल त्याच्या शिवाय भाजप निवडणूक जिंकणारच असा विश्वास व्यक्त करत नेतेमंडळींकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरु आहे. मराठवाड्याची राजधानी अशी औरंगाबादची ओळख असून या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा, त्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना-भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रमुख निवडणूक प्रभारी तर आमदार अतुल सावे यांची निवडणूक प्रमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.
या नेतेमंडळींकडून बुथनिहाय बैठका घेण्यात येत असून शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंडळनिहाय आढावा घेण्याची जबाबदारी पक्षनेते, प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. क्रांती चौक मंडळाची जबाबदारी खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडे, आमदार अतुल सावे यांच्याकडे गुलमंडी मंडळ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याकडे हुडको मंडळ, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे यांच्याकडे अनुक्रमे चिकलठाणा व सातारा मंडळ देण्यात आले.