पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली, तर भाजपला (BJP) 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (NCP State Chief) व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रमाची महिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना जयंत पाटील यांनी उत्तरे दिली.
भाजपला हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. आता भाजपने मिशन मुंबईचा नारा दिला आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली, तर भाजपचे 50 आमदारदेखील निवडून येणार नाहीत.