मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वात जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. आता भाजपमधील अंतर्गत वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येते. आधीच एकनाथ खडसे यांनी भाजपवर आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपमधील नाराजांच्या संख्येत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यसभेतील खासदारासह अनेक आमदार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
भाजपाची मेगाभरती निवडणुकीच्या दरम्यान सर्वाधित चर्चेत होती. विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड, चित्रा वाघ अशा अनेक नेत्यांना भाजपाने पक्षात सहभागी करुन घेतले होते. मात्र राज्यात निकालानंतर घडलेल्या सत्तानाट्यात भाजपाची सत्ता गेली आणि यातील अनेकांचा हिरमोड झाला. भाजपातील काही आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. तर भाजपाची एकही आमदार फुटणार नाही, विरोधकांनाच भीती आहे की त्या तीन पक्षाचे आमदार सोबत राहतील का ? यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा दावा भाजपाचे आशिष शेलार यांनी केला आहे.
मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ आणि आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी देखील या आमदारांनी दर्शवल्याचे समजते. मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. भाजपवर नाराज असलेला एक खासदार शरद पवारांच्या निर्णयावर राजीनामा द्यायला तयार असल्याची माहिती देखील समोर येते. तसेच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या जवळचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
Visit : bahujannama.com