नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – सर्वच एक्झिट पोलमधून एनडीए सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे परंतु २३ मे नंतर काय होणार याची उत्सुकता शिगेला असतानाच स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देशात एनडीएला बहुमत मिळेल आणि भाजप सत्तेतही येईल मात्र त्यानंतर देशात लोकशाहीचा अस्त होईल असं यादव यांनी म्हटलं आहे.
२३ मे नंतर देशात लोकशाही नाही तर हुकुमशाही नांदेल असेही योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. देशातली घटनात्मक व्यवस्था कोसळून जाईल तसेच या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणं गरजेचं आहे असंही ते म्हटले आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगेंद्र यादव यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
या आधी देशात बुथ कॅप्चर केले जायचे. मात्र भाजपाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली आहे असेही यादव यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी काठ्या आणि बंदुकांचा नाही तर कॅमेरा आणि टीव्ही माध्यमांचा वापर करत भाजपाने निवडणूक कॅप्चर केली आहे तसेच सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही इतका अमाप पैसा भाजपाने निवडणुकीत खर्च केला आहे असाही आरोप योगेंद्र यादव यांनी केला.