मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी वर्ध्यातील हिंगणघाट आणि औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त करत महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे, अशी जन भावना तयार होत असल्याचे म्हटले आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असून ती पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष देत आहे. अशातच आता औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याची घटना घडली असून पीडित महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
तसेच उदयनराजे यांनी त्यांच्या ट्विटरद्वारेही संताप व्यक्त केला आहे. “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले.
या राक्षसी प्रवृत्ती ला संपवण्याची वेळ आता आलीये. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे.— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 5, 2020
या दोनही घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे. या घटनेत ५० वर्षीय महिला ही गंभीररित्या भाजली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.