बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘मी पुन्हा येणार’ असं म्हणणारे नेते आज विरोधी पक्षात बसले आहेत. हे अद्यापही त्यांनी मान्य केलेले दिसत नाही. त्यामुळे प्रलोभने दाखवून व्याभिचार करीत सत्तेत येण्याचा या ना त्या मार्गाने भाजपचा(BJP ) प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्ष अडचणीत असल्याने महाविकासआघाडी विरुद्ध वेगळा अपप्रचार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर आदीं यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, दोन ते तीन महिन्यांत आम्ही सत्त्तेत येऊ असे ते गेले वर्षभर सातत्याने सांगत आहेत. भाजपकडून(BJP ) सरकारच्या कारभाराबाबत गेली वर्षभर अपप्रचार सुरू आहे. विरोधकांचा अपप्रचार सुरू असला तरी महाविकासआघाडी सरकारने वर्ष पूर्ण केली. सुरुवातीला कामकाजाचे तीन-चार महिने मिळाले. त्यात त्या सरकारने धाडसी व जोखमीचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोना संकटकाळानंतर आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा हे सरकारच्या विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत राहणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये गेलेल्याची होतेय कोंडी
निवडणुकीपूर्वी जे नेते भाजपमध्ये गेले होते त्यांची तिथे कोंडी होत आहे. याशिवाय इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पद दिल्याने भाजपमधील एक वर्ग चिडलेला आहे. ते सर्व नेते महाविकासआघाडीतील पक्षांच्या संपर्कात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले, की कामगार संघटनांच्या मागणीनुसार एसएससीईटीला मुदत वाढ देण्याचा आदेश निवडणूक काळात काढण्याचा प्रयत्न झाला. या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारचे फाईल पुटअप करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल ते कुणाच्या सांगण्यावरून हे काम करत आहेत हे शोधले जाईल.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे मातोश्रीच्या पिंजऱ्यातील वाघ अशी टीका केली होती ्याबाबत विचारले असता “गंजलेल्या तोफेतून निघणार्या गोळ्यांचा आम्ही फारसा विचार करीत नाही.”