लासलगाव : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधान परिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे वक्तव्य राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
शनिवारी लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. काही दिवसांपूर्वी इतरांना इकडे तिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, हे छगन भुजबळ यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नाहीत. या निवडणुकी निमित्ताने जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलेले दिसले. अगदी पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.