कोलकाता : वृत्तसंस्था – सध्या पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार रोखण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. बंगालचा गुजरात करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप ममता दीदींनी केला आहे.
लोकसभेच्या तोंडावर सुरू झालेले भाजप आणि ममता यांच्यातील राजकीय युद्ध थांबायला काय तयार नाही. त्यातच भाजपाची बहुमताने एकहाती सत्ता आल्याने भाजप अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शहा आणि मोदींची भेट घेतल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु आहे. त्यावरून ममतांनी भाजपवर चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या कि, राज्यपाल संवैधानिक पद असल्यामुळे मी त्रिपाठी यांचा आदर करते, मात्र प्रत्येक पदाची संवैधानिक मर्यादा असते. बंगालची अवस्था गुजरातसारखी बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र बंगाल हे गुजरात होऊ शकत नाही. असा टोला त्यांनी भाजपला लगावला.