बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. आणि येत्या २०२४ च्या निवडणुकीच्या प्लॅनचा मुद्दा उपस्थित केला आहे. येणारी लोकसभा निवडणूक ही २०२४ मध्ये होणार असून तर त्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं तसेच ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे..
२०१४ मध्ये जवळपास १७ कोटी मतदान मिळवून देशात भाजपाचं सरकार आलं आहे. त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला २२ कोटी मतदान झालं, या निवडणुकीत ३०३ जागा भाजपानं घेतल्या. त्यासोबत देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचे बहुमत असताना ४०० जागा का असा प्रश्न पडू शकतो, मात्र काही कायदे असे आहेत ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चर्तुर्थांश बहुमताची गरज पडते, म्हणून भाजपाला ३० कोटी मतं लागतील असे ते म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करत असताना जास्तीत जास्त मतं भाजपाच्या कमळ चिन्हासोबत कशी जोडता येतील यासाठी प्रयत्नशील राहावं असे आवाहन देखील चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
तसेच, पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळातील अनेक समस्या उद्योग आघाडीने सोडवल्या. लघु उद्योजकांच्या अनेक मागण्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध सुविधा देण्यात आल्या, महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकारकडेही काहीही प्रश्न असले तरी समस्या असतील तिथे मांडल्या पाहिजेत, आंदोलन करू शकत नसाल तरी निवेदन देऊन त्या समस्या पुढे आणाव्यात, त्यामुळे उद्योग आघाडीसोबत माणूस जोडला जाईल, त्याचा फायदा निश्चितच भाजपाला होणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तर, मनसेने अमराठी नको ही भूमिका बदलावी, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मनसेत उत्तर भारतीय प्रवेश करत असतील तर आनंद आहे. मनसेच्या हिंदुत्वाबद्दल शंका नाही, त्यामुळे मनसेसोबत युती होऊ शकते असंही विधान त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.