बहुजननामा ऑनलाईन टीम : काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या २९ व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, खेळाडू, अभिनेत्यांकडून त्यांचं अभिनंदन केल जात आहे. मात्र भाजप राज्यसभा खासदार आणि प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत जहरी टीकादेखील केली आहे. जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी उद्धव ठाकरेंना गोडसे भक्त म्हणत, सामनाचं नाव बदलून ‘सोनिया नामा’ करा असा टोलाही लगावला आहे.
जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं कि, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी एका राजवटीसमोर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली आहे. सामनाचं नाव ‘सोनिया नामा’ करत आता पूर्ण आत्मसमर्पण करा. तुमच्या तिसऱ्या दर्जाच्या वृत्तपत्रात येणाऱ्या मूर्ख संपादकीय ते सहन करणार नाहीत”.
राज्यातील इतक्या दिवसांच्या राजकीय संघर्षानंतर अखेर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, शिवसेनेची स्थापना आणि प्रसार झालेल्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. तसेच यावेळी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
Visit : bahujannama.com