बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून दोन्ही पक्षातील वाद वाढल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेना दोन्ही पक्षांसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या गोंधळात दिल्लीच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असून सोबतच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचं आश्वासनही दिलं आहे, भाजपच्या या ऑफरमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र या कथित ऑफरबद्दल कोणत्याही नेत्याने अधिकृत भाष्य केलेलं नाही. दरम्यान भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजपसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होणार भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. हि भेट राजकीय नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असल्याचे समजते आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या पंतप्रधान भेटीनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळदेखील पवारांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Visit : bahujannama.com