सातारा : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांना व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांनी विरोध केला आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही लॉकडाऊन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा जनतेत उद्रेक होईल असा इशारा दिला आहे. संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे अशी विनंती उद्यनराजेंनी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. कोरोना रोखण्यासाठी लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला दिलासा द्यावा असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. निर्बंध घालताना सरकारने विविध क्षेत्रांतील परिणामांचा अजिबात विचार केला नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत. रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय, फेरीवाले आदींच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना विशिष्ट नियमावली घालून देऊन त्यांचा रोजगार सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शैक्षणिक फी बाबतसुद्धा शासन कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नसल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.