सातारा : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आणखी किती दिवस तुम्हाला मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?, असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
साता-यात मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला आहे. खा. भोसले म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. पण किती दिवस मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा किती दिवस द्यायची? असेही ते म्हणाले. तुम्ही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार का, असा प्रश्न यावेळी उदयनराजेंना विचारला असता त्यावर नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार असेल, तर चर्चा करण्यात अर्थ असल्याचे ते म्हणाले.
Action ला Reaction मिळाल्यास ती जबाबदारी सरकारची..
गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले नेते आजही सत्तेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. अन्यथा मराठा समाज सरकारमधील नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचे आश्वासन दिले जाते. पण प्रश्न मार्गी लागत नाही. राज्यात मराठा ही निर्णायक जात आहे. विश्वासघात झाल्यास सरकारला जनताच खाली खेचेल. ऍक्शनला रिऍक्शनला मिळाल्यास जबाबदारी सरकारची असे, अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.