गोरखपूर : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सर्वत्र मंदीचे सावट असता जीएसटीमुळे महसुलात घट झाल्याने आता अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.. यामुळे केंद्र सरकारला आरबीआयकडून पैसे घेताना भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या विकायला काढण्याची वेळ आली आहे. यावर डॉक्टर असलेल्या गोरखपूरमधील भाजपा आमदाराने होमिओपथिक औषध अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सांगितली आहे.. फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांनी हा उपाय सुचविला आहे.
‘आज देशातील आर्थिक मंदीचे मूळ कारण म्हणजे मागणीत घट. उत्पादक माल कोणासाठी बनविणार? तो त्याचे पैसे माल बनविण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवतो. आम्ही जेवढे पैसे त्यांना मदतीसाठी दिले ते त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी वापरलेच नाहीत. कारण त्यांचा जुनाच माल विकला गेलेला नाही. जेव्हा लोकांच्या मनातून दोन नंबरचा पैसा पाप असतो, याचे ओझे संपून जाईल तेव्हा ते पैसे बँकेत ठेवतील किंवा त्यांचे जिवनमान सुधारण्यासाठी वस्तू खरेदी करतील. त्यांच्याकडे पैसा आहे पण तो १ नंबरचा नाहीय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
सोबतच हे सांगताना त्यांनी अर्थमंत्र्यांना नाराज होऊ नका, अशी विनंतीही केली आहे. जेव्हा दोन नंबरचा पैसा संपेल तेव्हा विक्री वाढल्याने उद्योजक अधिक माल उत्पादन करतील. यामुळे आयकरच रद्द करावा, असे दास यांनी म्हटले आहे.
वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्यासाठी स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती. परंतु दोन्ही प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यातच वर्षभरानंतर जीएसटी लागू केल्याने भारतीय अर्थव्यस्था अजून डगमगली आहे. देशातील आर्थिक मंदीवर केंद्र सरकारला उपाय सापडत नसताना गोरखपूरचे भाजपा आमदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आयकरच बंद करण्याचा उपाय सुचविला आहे.
दरम्यान, डॉ. राधा मोहन दास अग्रवाल हे भाजपचेच आमदार असून उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपालाच, सरकारी अधिकाऱ्यांनाच कधी कधी अडचणीत आणतात. गोरखपूरमध्ये भूमिगत वीजतारा टाकण्यातील भ्रष्टाचार उकरून काढत त्यांनी भाजपाच्या आमदाराची कंपनी काळ्या यादीत टाकायला लावली होती.