मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्ज 24 तास उघडे ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. मात्र मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मुंबईत नाइटलाइफमुळे निर्भयासारख्या हजारो घटना घडतील, असा दावा भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी केला आहे.
26 जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ सुरु करण्याची घोषणा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. नाइटलाइफच्या संदर्भात मंत्रालयात देखील एक बैठक पार पडली. प्रायोगिक तत्वावर नाइटलाइफ सुरु करण्यासाठी या बैठकीत संमती देण्यात आल्याचे समजते. सरकारच्या या निर्णयाला भाजपाकडून विरोध होत आहे. मुंबईतील भाजपा नेते राज पुरोहित यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
नाइटलाइफमुळे मुंबईत निर्भयासारख्या घटना घडतील असा दावा करतानाच पुरोहित यांनी भारतासाठी ही संस्कृती योग्य आहे का याचा विचार करावा, असेदेखील सुनावले आहे. मुंबईमध्ये नाइटलाइफचा प्रयोग येत्या 26 जानेवारीपासून केला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रथम नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून नाइटलाइफची सुरुवात होणार आहे. येथील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास उघडे ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
Visit : bahujannama.com