मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असून त्या पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र आणत ‘माधव’चा प्रयोग केला होता. भाजपावर दबाव आणण्यासाठी पंकजा मुंडे ‘माधवबरा’ (माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत) या समुदायांना एकत्र आणू शकतात. उद्या गोपीनाथ गडावरुन याबद्दलची घोषणा होऊ शकते.
आता पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपूत यांचीदेखील मोट बांधण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं आहे. उद्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
मात्र पंकजा मुंडे यांचं काही ठरलं नसून त्या पक्षातच राहतील, असा विश्वास त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पंकजा मुंडे उद्या नेमका कोणता निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Visit : bahujannama.com