बहुजननामा ऑनलाइन टीम : राज्यातील गोरगरीब जनतेसाठी 10 रुपयात शिवभोजन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये 6 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे कुटुंबीयांचा एक फोटो निलेश राणे यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जेवण वाढलेले दिसत आहे. तो फोटो ट्विट करून ही थाळी किती रुपयांची आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दिसत आहे.
ही थाळी किती रुपयाची आहे??? pic.twitter.com/eFccKefIkW
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 25, 2019
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात १० रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. काही दिवसांपुर्वी मुंबई महानगरपालिकेतही 10 रुपयांमध्ये थाळी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर ही थाळी सर्वसामान्यांना कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता शिवभोजन योजनेला म्हणजेच 10 रुपयांत थाळी मिळण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही थाळी सामान्यांसाठीही उपलब्ध होणार आहे.
Visit : bahujannama.com