मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गेले होते. या भेटीनंतर फडणवीस यांनी म्हटले, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या सर्व परिस्थितीवरील मौन चिंताजनक आहे. मात्र, ते या घटनांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे’.
राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या काही घटना समोर येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचे या सर्व परिस्थितीवरील मौन अधिक चिंताजनक आहे. मात्र, ते या घटनांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात काही वेगळेच बोलत असतात. त्यांची काहीही भूमिका नाही.
दरम्यान, सरकारला वाचवण्यासाठी राज्यात काही गोष्टी सुरु आहेत. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी या विषयांवर बोलायला हवे. मात्र, त्यांना माहीत आहे, की या मुद्द्यांवर बोलणे अवघड आहे. यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल, असेही ते म्हणाले.
संजय राऊत मोठे नेते नाहीत
संजय राऊत हे सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे अधिकृत वक्तव्य मानता येणार नाही. संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ, एवढे मोठे नेते संजय राऊत नाहीत, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.