मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक म्हणजे विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती. महाविकास आघडी सरकारने 12 सदस्यांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. मात्र, राज्यपालांकडून त्याला मंजूरी मिळालेली नाही. दरम्यान, राजभवनात या आमदारांची यादीच नसल्याची माहिती समोर आली. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राज्यपालांवर टीका करण्यात आली. तसेच राजभवनात भुताटकीचा वावर वाढला आहे ? एकदा शांतीयज्ञ करुन घ्यावा लागेल असंही म्हटलं. यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
एक डाव भुताचा भारी पडेल
भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत ? रोज नुसते 12-12 ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय 12 वाजलेत का ? भुतानं जर फाइल पळवली असे तुमचे म्हणणे असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही करत नाहीय. पण भाजपने जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराच आशीष शेलार यांनी राऊतांना दिला आहे.
यांना राजकारणाचा ‘महारोग’ जडला
आशिष शेलार म्हणाले, कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला ? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणुकीचे काम केले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जबाबदार धरले जाते. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते ? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, यांना राजकारणाचा महारोग जडला आहे.
राजभवनात यादी असल्याचा दावा
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे या 12 आमदारांच्या नावाची यादी मागितली होती. त्यानंतर ही यादी उपलब्ध नसल्याचे सचिवालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसेनेने यावर टीका केली. मात्र, आता राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. राजभवनाकडे विधान परिषदेच्या या 12 सदस्यांची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी सांगितली.