गुवाहाटी : वृत्तसंस्था – नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत. यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. सर्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र आणि ग्रंथ शिकवण्यासाठी यापुढे सरकार खर्च करणार नाही, अशी माहिती आसाम सरकारचे मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली.
सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद केले जाणार आहेत, असे भाजपा सरकारने म्हटले आहे. या संदर्भात एक पत्रकही जाहीर केले आहे. दरम्यान, भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारनं ही अधिसूचना जारी केल्यानंतर ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले की, भाजपा सरकारने मदरसे बंद केले तरच त्यांचा पक्ष पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका जिंकेल. सत्तेत आल्यानंतर पुन्हा मदरसे सुरू केले जातील.
सरकारकडून चालवले जाणारे मदरसे सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती फेब्रुवारी महिन्यातच देण्यात आली होती. धर्मनिरपेक्ष देशात सर्वसामान्य जनतेच्या पैशातून धार्मिक शिक्षणासाठी निधी देणे योग्य नाही त्यामुळे यावर खर्च करता येणार नाही असे हिमंता यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते.