बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे फिरल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्ग्ज नेत्यांनी भाजप – शिवसेनेत प्रवेश केला आहे. ३१ जुलै रोजीच अनेक दिग्ग्ज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक या नेत्यांचा समावेश होता. या पक्षांतरानंतर आता पुन्हा १० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हि यात्रा मराठवाडा आणि विदर्भात जाणार आहे. यावेळी मराठवाडा- विदर्भातील अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपात आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक आमदार प्रवेश करणार आहेत.
शरद पवार यांनी भाजपावर आरोप केला होता की, ईडीसह अन्य तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजप आमदारांना फोडत आहे. या आरोपावर चोख उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कोणीही उठावे आणि यावे. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. येथे जे चांगले काम करतात त्यांचाच स्वागत केले जाते . येणाऱ्या प्रत्येक नेत्याचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात आहे आम्हाला कोणालाही धमक्या देऊन पक्षात घेण्याची आवशक्यता नाही. एक काळ असाही होता की भाजपचे कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
अनेक नेते हे भाजपच्या विकासाचे काम पाहून पक्षात येत आहेत. अशा नवीन नेत्यांच्या येण्याने जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही. विधानसभेपर्यंत अनेक नेत्यांचे भाजपात प्रवेश होणार आहे. आलेल्यांना आणि येणाऱ्यांना त्यांच्या कर्तुत्वानुसार जागा आणि मान- सन्मान देण्यात येईल. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.