पुणे बहुजननामा ऑनलाइन : सक्त वसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यांना वाटले तर ते भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.’आपल्या देशात निवडणूक आयोग, लष्कर, न्यायालय, आयकर विभाग अश्या काही स्वायत्त संस्था आहे.
ईडी विभागाकडून लगेच चौकशी केली जात नाही. विभागाकडून दोन- दोन वर्षे तपास केला जातो. एखाद्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी तीन – तीन वर्षे तपास केला जातो. ते इतके सोपे नसते. कोणत्याही राजकीय मतभेदातून लगेच ईडी कडून चौकशी होते,असे नाही.त्यामुळे भाजपमध्ये आल्यावरदेखील ईडीकडून चौकशी होऊ शकते.’ असे चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.
तसेच, कोल्हापूरनंतर आता पुणे शहर देखील डीजेमुक्त करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. गणेश मंडळांनी डीजे लावू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. ठरविलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यानंतरही तक्रार न झाल्यास पोलिसांवर देखील कारवाई होऊ शकते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन केलेल्या मंडळावर कारवाई करण्यात येईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.