कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – भाजप-शिवसेना ज्या पद्धतीने इतर पक्षातील लोकांना पक्षात घेत आहेत. ते पाहता आगामी विधानसभा निवडणूकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील. यात शंका नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, भाजप शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत. दोन्ही पक्षांना सत्तेत येण्याची खात्री नसल्याने ते इतर पक्षातील लोकांना सोबत घेत आहेत. पक्षांतर करणारे आणि करून घेणारे यांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत जनताच त्यांनी योग्य जागा दाखवेल. तसेच सत्तांतर अटळ आहे. असा दावा पाटील यांनी केला.
युतीला पराभूत करण्यासाठी जे पक्ष एकवटले आहेत. त्यांना सोबत घेण्यात येत आहे. पुढील १० दिवसांत घटक पक्षांशी जागा वाटप निश्चित केले जाणार आहे. १५ ऑगस्ट पुर्वी हे पुर्ण केले जाणार आहे. दर मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा वाटपाची बैठक पार पडते. निम्म्याहून अधिक जागांचा निर्णय झाला आहे. तर उर्वरित जागांबाबत लवकरच निर्णय घेऊ असे जयंत पाटील म्हणाले.
मुश्रीफ यांची गेले वर्षभर माहिती घेतली जात असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. मुश्रीफ यांना भाजपात येण्याची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली म्हणून पुढील पंधरा दिवस त्यांच्या घरावर आयकरची धाड पडली. याचा उद्देश वेगळा सांगण्याची गरज नाही.