मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेचा वाद आता थांबवणार असल्याची चिन्ह आहेत. कारण उद्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. काहीही झाले तरी सत्ता महायुतीचीच येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे गुरुवारी स्थापनेचा तिढा सुटणार असल्याचं दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. भाजप-शिवसेना सत्तासंघर्षावर पुन्हा एकदा आज चर्चा करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या मुद्यावर आज मुख्यंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक बोलवली होती. सरकारनं सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी यावेळी केली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने आपण बैठकीला उपस्थित असल्याचे शिवसेना नेत्यांनी यावेळी अवर्जून सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. शिवसेना भवनात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत.