मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेनेने मिळून सरकार बनवावं. आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून काम करू असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही काळापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेला घेऊन चर्चा सुरु आहे अशी माहिती सूत्रांनी दिली होती. काही वेळापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पवारांमध्ये भेट झाली होती. दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली होती. यानंतर आता पवारांनी मात्र विरोधी पक्षनेता म्हणून काम करण असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांना राऊत आणि त्यांच्यातील भेटीविषयी विचारले असता त्यांनी राऊतांनी कोणताही प्रस्ताव आपल्या समोर मांडला नाही असे सांगितले. राऊत आणि त्यांच्यात अधिवेशनाला घेऊन चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जनतेने भाजप आणि शिवसेनेला कौल दिला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने मिळून सरकार बनवावं. आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून काम करू असेही पवार म्हणाले.
यानंतर पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. दिल्लीत सुरु असलेल्या पोलिसांच्या आंदोलनावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्यात पोलिसांची स्थिती वाईट आहे. दिल्लीतील पोलिसांच्या आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार आहे असं ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, “राज्यात पोलिसांची स्थिती खूपच वाईट आहे. एका पोलिसाला रस्त्यात आणि तेही वर्दीत असताना मारहाण होते ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना रविवारची सुट्टीही मिळत नाही. दिल्लीत पोलिसांचे जे आंदोलन सुरू आहे त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे” असंही पवारांनी म्हटलं आहे. याशिवाय पवारांनी शेतकरी आणि अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.