नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यास दिरंगाई झाल्यावरून केंद्रातील भाजपा सरकार आणि दिल्लीच्या आम आदमी पार्टीमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही पक्षांचे नेते निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात झालेल्या उशीरावरून एकमेकांवर आरोप करत आहेत.
उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा हल्ला केला आहे. गुरूवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिरंगाईचा आरोप केजरीवाल सरकारवर केला होता, ज्यावर प्रत्युत्तर देताना उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जोरदार हल्ला केला.
सिसोदिया म्हणाले, केंद्राचा एक वरिष्ठ मंत्री एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर खोटे बोलतो याचे दुःख वाटते. पोलीस तुमचे, कायदा व्यवस्थेची जबाबदारी तुमची, तिहारचा डीजी तुमचा, मग प्रश्न आम्हाला का विचारता ? मला माहिती आहे की, तुमच्या जवळ मुद्दे नाहीत, पण एवढी खालच्या दर्जाची वक्तव्य करू नका. दिल्ली पोलीसांना दोन दिवसांसाठी आमच्याकडे द्या, निर्भयाच्या दोषींना फासावर चढवू.
उशीरासाठी भाजपा जबाबदार : संजय सिंह
यापूर्वी आम आदमी पार्टीचे दिल्ली निवडणुक प्रभारी आणि खासदार संजय सिंह यांनी भाजपावर हल्ला करताना म्हटले होते की, सर्वांना माहिती आहे की दिल्ली पोलीस भाजपा आणि केंद्राच्या हातात आहे. फाशीला झालेल्या उशीराला भाजपा जबाबदार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यासाठी माफी मागितली पाहिजे. दिल्ली सरकारने दया याचिका काही तासात फेटाळली होती. दिल्ली सरकारचा पोलिसांशी काहीही संबंध नाही.
संजय सिंह यांनी म्हटले की, तिहार करागृहातील नियुक्त्या एलजी करतात तर जबाबदारी दिल्ली सरकारची कशी? निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्यास झालेल्या उशीराला भाजपा जबाबदार आहे.