बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या टप्प्यावर नेणारी एक मोठी घडामोड लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंची वर्षा निवासस्थानी भेट झाली असून त्यामध्ये बिहार निवडणूक एकत्र लढवण्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका राज्यातील 2 प्रादेशिक पक्ष एकत्रितपणे दुसऱ्या राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं दुर्मिळ राजकारण या निमित्तानं प्रत्यक्षात येऊ शकतं. ठाकरे-पवार भेटीत बिहार निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचंही समजत आहे. शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. थेट भाजप आणि एनडीएला शह देण्याचा सेनेचा प्रयत्न यात स्पष्ट दिसतो. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवली गेली तर त्यातून नव्या राजकारणाचा उगम होऊ शकतो.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यात निवडणुकीय राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि प्रशासकीय विषयांवरही मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात चर्चा झाली.