नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान शनिवारी (दि. 21) मध्यरात्री मोठी चकमक झाली. चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. गया येथील बाराचट्टी जंगल परिसरात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची कोब्रा बटालियन आणि बिहार पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आमना- सामना झाला.
आलोक यादव असे चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांच्या कमांडरचे नाव आहे. या माओवाद्यांकडून एक एके- 47 आणि एक इन्सास रायफल जप्त केली आहे. दरम्यान, या चकमकीनंतर शोधमोहीम सुरू आहे. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता बोधीबिगरा गावात नक्षलवाद्यांनी एक सामुदायिक भवन डायनामाइट लावून उध्दवस्त केले होते. आपला प्रभाव दर्शवण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सामुदायिक भवन उडवण्यात आल्याचे समोर आले होते. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेण्यापूर्वी हा हल्ला झाला होता. सामुदायिक भवन उद्ध्वस्त केल्यानंतर माओवाद्यांनी तिथे दोन आयईडी सोडले होते. तसेच एक पत्रकसुद्धा सोडले होते. त्यामध्ये भाजपा आणि एनडीए सरकार उलथवण्याचा इशारा दिला होता.