मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेच्या वादातून फूट पडल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी जवळीक साधत सत्ता स्थापन केली. तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे जास्त जागा जिंकून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. यानंतर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वादामुळे भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु झाले.
आता महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका बसला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहनं काढली जाणार आहेत. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना यापुढे विशेष सुरक्षा नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. फडणवीस यांनी अनेक नक्षलवादी विरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी झेड प्लस सुरक्षा होती.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या शिवाय संजय बनसोडे, अस्लम शेख, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना झेड सिक्युरिटी मिळत होती. त्याठिकाणी आता वाय सिक्युरिटी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.