सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना रुग्णांवर उपयुक्त असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, ऑक्सिजन व्यवस्थित राहिल्यास 80 टक्के कोरोना संक्रमित रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची आवश्यकता नाही, असे सोलापूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच रेमडेसिविर औषधाचा अधिक मारा झाल्यास कोडनी आणि लिव्हरवर परिणाम होऊन ते कमकुवत होतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे उपस्थित होते. रेमडेसिविरसाठी डॉक्टरांपेक्षा रुग्णांकडून अधिक मागणी आणि आग्रह होत असल्याचा दावा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केला.
रुग्णांचा आग्रह असल्यास डॉक्टरांनी एकाच वेळी सहा-सहा इंजेक्शन लिहून देणे कितपत योग्य आहे, या औषधाची मूळ किंमत आणि डॉक्टरांकडून आकारली जाणारी किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. पैशांसाठी डॉक्टर आवश्यकता नसतानाही रेमडेसिविर लिहून दित आहेत, अशी माहिती काही प्रकरणांसह पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिका आयुक्त निरुत्तर झाले. आयुक्तांच्या निराधार दाव्यामुळे त्यांनी स्वत:वर पत्रकारांचा रोष ओढावून घेतला.
रेमडेसिविर औषधाला शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच या इंजेक्शनचा काळाबाजार फोफावला असून औषधाचा कृत्रिम तुटवडा डॉक्टरांकडून सुनियोजित होत असल्याची अनेक प्रकरणांची माहिती पत्रकारांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.
आयुक्त म्हणाले, रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून औषध मागवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे. त्यामुळे येथून पुढे डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शन मागवून घेतील. यापुढे औषध दुकानामधून या इंजेक्शनची विक्री होणार नाही. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजन डीलर व्यवस्थित पुरवठा करतात की नाही, याचाही आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.