बहुजननामा ऑनलाइन टीम – येथील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी फूट पडली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नियुक्तांमुळे मनसेत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष अशा एकूण ३२० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने कल्याण डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
लवकरच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, कल्याण पूर्व भागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पदांच्या वाटपावरुन नाराजीचा उद्रेक समोर आला आहे. मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण, आता त्यांची घरवापसी झाली आहे.
पक्षात आल्यावर त्यांची कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कल्याण पूर्व डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधील सात ते आठ जणांना पदांवर नियुक्त करण्यात आले. परंतु, पक्ष सोडून गेलेला व्यक्ती पक्षात आल्यावर मोठ्या पदावर नियुक्ती केल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पदे देताना आम्हाला विश्वासात घेण्यात येत नाही, असा आरोपच पदाधिकाऱ्यांनी केला.
त्याच अनुषंगाने उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सुपूर्द केले. त्यात ५ शाखाध्यक्ष, २ विभाग अध्यक्ष, ६ उपविभाग अध्यक्ष, ५८ उपशाखा अध्यक्ष आणि २३४ गट अध्यक्षांचा समावेश आहे.
..त्यांनी पक्षासाठी काय काम केले
दरम्यान, याबाबत बोलताना माजी नगरसवेक आणि विधानसभा कल्याण पूर्व अध्यक्ष अनंता गायकवाड म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्या बद्दल मला कल्पना नाही. मी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे, त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काय केले, असा सवालच गायकवाड यांनी उपस्थित केला.