बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार भूपिंदर सिंह मान(Bhupinder Singh Mann) हे गुरुवारी कृषी कायद्यांसदर्भात सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या कमिटीतून बाहेर पडले. त्यांनी एक पत्र लिहून ही माहिती दिली. पत्रात त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करत लिहिले की, मी नेहमी पंजाब आणि शेतकर्यांच्यासोबत उभा आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांबाबत सुनावणी करताना चार सदस्यीय कमिटी गठित केली होती. यासोबतच कोर्टाने नवीन कृषी कायद्यांवर सुद्धा पुढील आदेशांपर्यंत प्रतिबंध लावला होता. भूपिंदर सिंह मान यांच्याशिवाय कमिटीत तीन अन्य सदस्य – कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, अंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेचे डॉ. प्रमोद कुमार जोशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अनिल धनवट आहेत.
माजी खासदार भूपिंदर सिंह मान यांनी वक्तव्य जारी करत म्हटले की, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कायद्यांवर शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू करण्यासाठी बनवण्यात आलेल्या चार सदस्यीय कमिटीत मला सहभागी केल्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतो. एक शेतकरी आणि स्वत: युनियन लीडरच्या रूपात, समान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या भावना आणि शंका पाहता, मी पंजाब किंवा शेतकर्यांच्या हिताशी तडजोड करू शकत नाही, यासाठी मी देण्यात आलेल्या कोणत्याही पदापासून दूर होण्यास तयार आहे. मी स्वत: कमिटीतून बाहेर पडत आहे. शेतकरी आणि पंजाबसोबत नेहमी उभा राहीन.
कृषी कायद्यांवर कमिटी गठित केल्यानंतर आंदोलन करत असलेल्या विविध शेतकरी संघटनांचे नेते कमिटी सदस्यांवर निशाणा साधत होते. शेतकर्यांनी कमिटीमध्ये सहभागी चारही सदस्यांवर सरकारचे समर्थक असल्याचा आरोप केला होता. शेतकर्यांचे म्हणणे आहे की, सर्व सदस्य सरकारचे समर्थक आहेत, मग अशा स्थितीत ते कायद्यांबाबत रिपोर्टसुद्धा सरकारच्या बाजूने देतील. याच कारणामुळे कमिटीच्या समोर आपले मुद्दे मांडण्यास सुद्धा शेतकर्यांनी नकार दिला आहे.