मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज मुंबई येथे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच आज एनआरसी आणि सीएए विरोधात त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली होती. त्यामुळे वंचितचे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बंदचे आवाहन केले आहे. पण अमरावती, अकोला, सोलापूर यांसह अनेक ठिकाणी बंदच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून अमरावतीमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी दुकानावर दगडफेक केली असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. दगडफेक करणारे चेहरा बांधून आले होते, असे आंबेडकर यांनी सांगितले. तर एकीकडे अकोल्यात भाजपने बंदला विरोध केला असून तिथेही भाजप आमदार आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. पण थोड्या वेळाने मात्र तेथील लोकांनी त्यांचा वाद मिटवला.
प्रकाश आंबेडकर यांनी हिंसा झालेल्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले. तसेच गुन्हे दाखल झाले असतील तर तेही मागे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी चार वाजता ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्याची घोषणा केली आहे. आम्ही दिलेल्या महाराष्ट्र बंदला शंभर संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच महाराष्ट्र बंदच्या हाकेला महाराष्ट्राच्या जनतेने साथ देत महाराष्ट्र बंद ठेवला. त्यासाठी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेचे जाहीर आभार त्यांनी मानले. तसेच या बंदमध्ये कोणतीही जबरदस्ती केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईमधील घाटकोपर येथे एका बसवर दगडफेक झाली असून त्या व्यक्तीने चेहरा झाकला होता.
दगडफेक केल्यावर तो तिथून फरार झाला. तेव्हा ती व्यक्ती कोण असल्याची चौकशी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांनी सांगितले. तसेच कोणत्याही कार्यकर्त्याला चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही, अशी ताकीद दिल्याचे सांगितले. तर दुसरीकडे पालघरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेली दुकाने उघडण्यासाठी जबरदस्ती केली असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी शांततेत हा बंद सुरु असल्याचे त्यांनी सांगत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी कोणतीही हिंसा केली नसल्याचा दावा केला आहे. हा बंद संघ आणि भाजपला दाखवून देण्यासाठी असून सीएए आणि एनआरसी हे हिंदूंच्या विरोधात असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे. तसेच ‘आम्ही कोणतीही जबरदस्ती केली नाही. आम्हाला कोणतीही जबरदस्ती न करता हा बंद पाळायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com