सातारा : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे बहुजन हिताचे, वंचित, सोशितांचे व सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारे सरकार असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
म्हसवड येथील अनुसूचित जाती – जमाती मुलामुलींच्या निवासी शाळेचे उद्घाटनानंतर पालिकेसमोर झालेल्या जाहीर सभेत ना. बडोले बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई, बाळासाहेब खाडे, शहराध्यक्ष अरविंद पिसे, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. उज्वल काळे, सचिन गुदगे, पं. स. सदस्य तानाजी काटकर, संतोष हिरवे, सुभाष विरकर, विजय टाकणे, मार्तंड गुरव, जालिंदर खरात, गणेश माने, संदीप भोसले, महेश लिंगे, सचिन लोखंडे, अविनाश मासाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. राजकुमार बडोले म्हणाले, मागील पंधरा वर्षातील सरकारने काय केले हे आपण पाहिले असेल, आताच्या साडेचार वर्षातील राज्य सरकारचे लोकहिताचे काम पाहिले आहे. काँग्रेसच्या मागील ४० वर्षांच्या राजवटीत गरीबी हटावच्या आजवर नुसत्या घोषणाच झाल्या. मात्र, गरीब हे गरीबच राहिले, परंतु सध्याच्या केंद्रातील मोदी, राज्यातील फडणवीस सरकारने शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत सर्वसामान्य माणसासाठी काम केले. मोठ्या लोकांनी बँका बुडवण्याचे काम केले. सर्वसामान्यांची बँकेत जनधन योजनेतून ३४ हजार कोटी लोकांनी खाती उघडली. विविध अनुदाने बँक खात्यात जमा केली जात आहेत.
यावेळी अनिल देसाई म्हणाले, म्हसवड येथील ७ कोटी रुपये खर्चाच्या निवासी शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले असून भाजपाच्या माध्यमातून दुष्काळी माण-खटावमध्ये विकासपर्व उभे राहत आहे. पक्षाला आम्ही माण तालुक्याने एक जि.प. सदस्य व एक पं. स. सदस्य दिला. परंतु पक्षाने तालुक्यात दोन केंद्रीय रस्ते दिले आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्याच्या कामांना ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.